स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांवरून संतापाचा उद्रेक; यवतमाळमध्ये राजीव गांधी पंचायती राज संघटनचे सत्याग्रह आंदोलन
यवतमाळ: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन ते पाच वर्षांपासून रखडल्यामुळे जनतेचे लोकशाही हक्क डावलले जात असल्याची जोरदार भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अंतर्गत राजीव गांधी पंचायत राज संघटनने राष्ट्रपतींना निवेदन सादर करत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
संघटनने म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने घटनाबाह्यपणे प्रशासक नेमून स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चालवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सत्तेचे केंद्रीकरण होत असून, सामान्य नागरिकांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग हळूहळू लुप्त होत चालला आहे. संविधानात स्पष्टपणे नमूद असलेले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वेळेवर आयोजन हे बंधनकारक असून, ओबीसी आरक्षणासंबंधी न्यायालयीन प्रकरणांचा गैरवापर करून निवडणुका टाळल्या जात असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.
राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधून यवतमाळमध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली आणि दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले.
सत्याग्रह आंदोलन कार्यक्रमा मध्ये पंचायत राज व्यवस्थे बाबत माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, यवतमाळ विधानसभा आमदार बाळासाहेब मांगुळकर, राजीव गांधी पंचायती राज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजयजी ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष (अ.जा.) संजय वानखडे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू देशमुख, उत्तमरावजी खंडारे, जिल्हाध्यक्ष राजूजी चांदेकर, संतोष बोरले ,उषाताई दिवटे, विकी राऊत, पल्लवी रामटेके, ओम तिवारी , पंढरी पाटे, कॉम्रेड सचिन मनवर, सोशल मीडियाचे कृष्णा पूसनाके यांचा समावेश होता.
या सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आवाहन करण्यात आले की, लोकशाही मूल्यांचे रक्षण करत तात्काळ स्थानिक निवडणुका जाहीर कराव्यात आणि ओबीसी आरक्षणाचा न्याय्य तोडगा लवकरात लवकर काढावा.