नांदेड मधील संवाद दौऱ्यात यवतमाळ चे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय भाऊ राठोड यांचे एक वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे..पण नंतर त्यांनी आपण तसे म्हटले नसल्याचेही सांगितले पण त्या वक्तव्याची खूप चर्चा झाली.
राज्यातील फडणवीस सरकारने मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडताना त्यांच्या प्रगतीचे पुस्तक जाहीर केले. त्यात, संजय राठोड हे नापास असल्याचे सांगण्यात आले, त्यावरुन मंत्री राठोड चांगलेच नाराज असल्याचे स्पष्ट झालं. मंत्रिमंडळाचे प्रगतीपुस्तक काढले आणि प्रगती पुस्तकात संजय राठोड नापास दाखवले. पण, मी कधी परीक्षा दिली नाही आणि कुणी पेपरही तपासले नाहीत, मग मी नापास कसा झालो? असे वक्तव्य जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नांदेडमध्ये संवाद मेळाव्यात बोलताना केले. बंजारा समाजाच्या संवाद बैठकीत राठोड यांनी बंजारा भाषेत तुफान फटकेबाजी केली. मी एकनाथ शिंदे यांना उठून सांगितले, संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही, मी तुम्हाला नापास करेल. मी तुम्हाला गोष्ट सांगत नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे आजही चांगले संबंध आहेत आणि मला उद्धव ठाकरे यांचे फोन सुद्धा येतात, असा खळबळजनक दावाही संजय राठोड यांनी पुढे बोलताना केला.
भाषणानंतर वक्तव्यावरुन घुमजाव
भाषण संपल्यानंतर संजय राठोड यांना या वक्तव्याबाबत विचारले असता मात्र त्यांनी घुमजाव केले. मी असे बोललोच नाही, असे राठोड म्हणाले. मात्र, राठोड यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहावे लागेल.
अखंड शिवसेनेचा नारा
दरम्यान, राज्यात दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा जोर धरत असून महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खासदार संजय राऊतांसह उद्धव ठाकरे यांनी देखील तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे, एकीकडे ठाकरेंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातील नेते गजानन कीर्तीकर यांनी अखंड शिवसेनेचा नारा दिला आहे. दोन ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनीही एकत्र यावे, असे त्यांनी म्हटलं. त्यातच, आता संजय राठोड यांचे वक्तव्य चर्चेत आलं आहे.